RIL AGM 2025: मुकेश अंबानींची मोठी घोषणा; AI क्षेत्रात नवीन कंपनी स्थापन करणार, गुगल आणि मेटासोबत भागीदारी

RIL AGM 2025: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात जागतिक आघाडीवर नेण्याच्या उद्देशाने ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ या नवीन कंपनीच्या स्थापनेची घोषणा केली. ही कंपनी भारताच्या डिजिटल भविष्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असे अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स इंटेलिजन्सचे चार प्रमुख उद्दिष्टे आहेत, ज्यामुळे भारत AI इनोव्हेशनचा जागतिक केंद्र बनेल.
गीगावॅट-स्तरीय AI डेटा सेंटर्स –
रिलायन्स इंटेलिजन्सचा पहिला उद्देश आहे गीगावॅट-स्तरीय AI-रेडी डेटा सेंटर्स उभारणे. ही केंद्रे पूर्णपणे हरित ऊर्जेवर चालतील आणि AI प्रशिक्षण व अनुमान प्रक्रियेसाठी डिझाइन केली जातील. भारताच्या वाढत्या AI गरजा पूर्ण करण्यासाठी ही केंद्रे गुजरातमधील जामनगर येथे बांधली जात असून, त्यांचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन होईल. हे पाऊल भारताला AI-आधारित तंत्रज्ञानात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी –
रिलायन्स इंटेलिजन्सने जागतिक तंत्रज्ञान आघाडीच्या कंपन्या आणि मुक्त स्रोत समुदायांशी भागीदारी करण्याची योजना आखली आहे. अंबानी यांनी सांगितले की, कंपनी आपली अभियांत्रिकी आणि अंमलबजावणी क्षमता जागतिक नेत्यांसोबत एकत्रित करून भारताला AI क्षेत्रात अग्रेसर बनवेल. याच योजनेअंतर्गत रिलायन्स इंटेलिजन्सने गूगलसोबत AI भागीदारी केली आहे. AGM मध्ये गूगलचे CEO सुंदर पिचाई यांनी सांगितले की, गूगल क्लाउडची AI तंत्रज्ञान आणि रिलायन्सची पायाभूत सुविधा एकत्र येऊन भारतात AI क्रांती घडवतील. हा करार JioBrain सारख्या व्यासपीठांना बळकटी देईल, ज्यामुळे डेटा विश्लेषण आणि स्मार्ट सेवांना चालना मिळेल.
प्रत्येक भारतीयासाठी AI सेवा –
रिलायन्स इंटेलिजन्सचा तिसरा उद्देश आहे प्रत्येक भारतीय नागरिक, लहान व्यवसाय आणि उद्योगांसाठी परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह AI सेवांचा पुरवठा करणे. या सेवा शिक्षण, आरोग्य आणि शेतीसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांत क्रांती घडवतील. अंबानी म्हणाले, “आमचे ध्येय प्रत्येक भारतीयाला AI सेवा उपलब्ध करून देणे आहे. आम्ही अशा सेवा तयार करू ज्या मोठ्या प्रमाणावर विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या असतील.”
भारताला इनोव्हेशन हब बनवणार –
रिलायन्स इंटेलिजन्सचा चौथा उद्देश आहे भारताला जागतिक स्तरावरील संशोधक, अभियंते, डिझायनर आणि उत्पादन विकसकांचे केंद्र बनवणे. अंबानी यांनी सांगितले की, संशोधनाची गती आणि अभियांत्रिकीची ताकद एकत्र करून नवीन कल्पनांना व्यावहारिक उपायांमध्ये रूपांतरित केले जाईल. रिलायन्स इंटेलिजन्स भारत आणि जगासाठी इनोव्हेशनचे केंद्र बनेल.ही घोषणा रिलायन्सच्या डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाला बळकटी देणारी ठरेल, तसेच भारताला AI क्षेत्रात जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.





