मुंबई : सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. सध्या लॉकडाउन उठवण्यासाठी घाई करणं हिताचं नाही. लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे, असे मत राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी निरनिराळ्या विषयांवर भाष्य केले. सध्या लॉकडाउनमध्ये कशी शिथिलता आणायची यावर केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काही बदल घडवावे लागणार आहेत. लॉकडाउन शिथिल होण्याची मीदेखील वाट पाहत आहे. आपल्याला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची सवय सुरूच ठेवावी लागणार आहे. त्याचा वापर करून आपल्याला कामाला जावे लागणार आहे. आपली लोकसंख्या पाहता ते कसं राबवायचं यावर सरकार विचार करत आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
आपल्याला मौजमजेसाठी नाही तर अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करणं आवश्यक आहे. लोकांच्या हाताला काम असणं आवश्यक आहे. लॉकडाउनबाबत काही सूचना असल्यास मला नक्की कळवा, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. आपण अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. आज उद्धव ठाकरेंकडे राज्यातील सर्वजण मोठा भाऊ म्हणून पाहत आहेत. याचा आनंद आहे. वरळी, सांगली आणि बारामती पॅटर्ननं राज्यात करोनाविरोधात चांगलं काम केलं आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रात सध्या करोनाच्या जास्त चाचण्या होत आहेत. एकंदरीत परिस्थितीवरून करोनावर मात करता येते हे दिसून आलं आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री उत्तम काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या.