Ricky Ponting slams India’s over-prepared turning pitches : कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताला दारूण पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. भारताने अत्यंत टर्निंग खेळपट्टी बनवण्याची जी रणनीती आखली होती, तीच आता त्यांच्यावर उलटल्याचे दिसून येत आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने टीम इंडियाला खास सल्ला दिला आहे. पॉन्टिंगची टीम इंडियाला खास चेतावनी आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना रिकी पॉन्टिंगने भारतीय संघाच्या खेळपट्टीच्या धोरणावर बोट ठेवले. ते म्हणाले, “हे लोक फिरकीपटूंसाठी इतक्या जास्त टर्निंग खेळपट्या तयार करतात की, त्यामुळे त्यांच्या फिरकी गोलंदाजीचा दर्जाच कमी होतो.” जेव्हा अशा टर्निंग खेळपट्ट्या मिळतात, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचे फिरकीपटू अधिक चांगली कामगिरी करतात. रिकी पॉन्टिंग पुढे म्हणाला, “गेल्या पाच-सहा वर्षांत भारत स्पिन गोलंदाजी पूर्वीसारखी चांगली खेळू शकत नाहीये. अशा खेळपट्ट्या तयार करून ते इतरांसाठी बरोबरीचा खेळ बनवत आहेत.” पहिल्या डावात १२४ धावांचे माफक लक्ष्य गाठतानाही भारतीय संघ अपयशी ठरला. अशा खेळपट्टीवर एक विकेट लवकर गेली की, दबाव वाढत जातो, असे पॉन्टिंगने नमूद केले. हेही वाचा – Hardik Pandya Engagement : हार्दिक-माहिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण ऋषभ पंतच्या नेतृत्वावरही भाष्य – गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत शुबमन गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतला कोचिंग दिलेल्या पॉन्टिंगने त्याच्या नेतृत्वावरही मत मांडले. तो म्हणाला, “तात्पुरत्या कर्णधाराची जागा घेणे कधीही सोपे नसते, विशेषत: जेव्हा तुम्ही काही दिवसांपूर्वीच कसोटी सामना हरलेला असता.” मात्र, पंत हा आता अनुभवी कसोटी खेळाडू आहे आणि यष्टिरक्षक असल्याने त्याला खेळातील स्थिती लवकर समजून घेण्यात मदत मिळेल. त्याने आयपीएलमध्येही नेतृत्त्व केले आहे, असं रिकी पाँटिंग म्हणाला. हेही वाचा – Sunil Gavaskar Slams : ‘हा चुकीचा पायंडा पाडू नका!’ लाजिरवाण्या पराभवानंतर गावस्करांनी टीम मॅनेजमेंटला धरलं धारेवर पहिल्या सामन्यात पत्कारावा लागलेला ३० धावांचा पराभव भारतीय संघासाठी खूपच अपमानास्पद होता. कारण दुसऱ्या डावात ते फक्त १२४ धावांचे लक्ष्य गाठू शकले नाहीत आणि आफ्रिकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे गडगडले.