शिक्रापूर -देशभरात करोनाचे संकट उभे राहिलेले असताना अनेक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा सर्वच व्यवसायांना मोठा फटका बसला असताना हातावर पोट असणारे रिक्षाचालकही या भीषण संकटातून सुटले नाहीत.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांना आहे.
शिक्रापूरसह परिसरात जवळपास दीडशेहून अधिक परवानाधारक रिक्षाचालक आहेत.काहींनी कर्ज काढून तसेच घरातील दागदागिने गहाण ठेवून भांडवल उपलब्ध करून रिक्षा खरेदी केलेल्या आहेत. परिसरातील कंपन्या, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी नागरिकांची ने आण करत मिळणाऱ्या चार दोन रुपयांमधून हे रिक्षा चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना अचानक देशभरात करोनासारखे भीषण संकट उभे राहिले आणि सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली.
दोन महिने लॉकडाऊन राहिल्यामुळे पहिलेच बॅंकेचे कर्ज असताना पुन्हा नव्याने पैसे अथवा कर्ज मिळविणे अशक्य होऊ लागले त्यामुळे रिक्षाचालक अजूनही संकटात सापडले, सध्या काही प्रमाणात लॉकडाऊन उघडले आहे; मात्र रिक्षा चालकांना वाहतुकीची परवानगी मिळाली नाही, त्यात खासगी बॅंकांचे कर्जाचा हप्ता भरणा करण्यासाठी फोन येऊ लागले असल्याने रिक्षा चालक हवालदिल झाले आहेत. आता थोड्याच दिवसात शाळा सुरु झाल्यानंतर मुलांच्या शाळेचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न रिक्षा चालकांना पडला आहे. परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाने काही मदत करावी, अशी अपेक्षा रिक्षाचालक करू लागले आहे.
आम्ही कर्ज काढून रिक्षा खरेदी केल्या. लॉकडाऊनमुळे आम्हाला रिक्षा घरी उभ्या ठेवाव्या लागल्या. सध्या हप्ता भरण्यासाठी बॅंकांचे फोन येत आहेत. आता खायलाच नाही मग हप्ता भरायचा कोठून? सरकारने रिक्षा चालकांसाठी काहीतरी करावे.
-जावेद पठाण, रिक्षाचालक