स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी मंगल पांडे यांची आज जयंती. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात 19 जुलै 1827 रोजी झाला. ते लहाणपणापासूनच धाडसी होते. नेमबाजी, तलवारयुद्ध इत्यादी कलांमध्ये ते तरबेज होते.
वर्ष 1849 मध्ये 22 वर्षांचे असताना ते बराकपूर ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यदलामधील बंगालच्या 34 व्या बी. एन. आय. तुकडीच्या 5 व्या कंपनीत भरती झाले. त्याच सुमारास लॉर्ड डलहौसी हा ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्या वेळी संपूर्ण हिंदुस्तानात इंग्रजी राजसत्ता स्थापन झाली असली, तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे छोटेमोठे राजे अथवा संस्थानिक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत. यामुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन झाले नव्हते. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. निपुत्रिक संस्थानांची संस्थाने खालसा करण्यात येऊ लागली. ब्रिटिश कायद्यांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्याचा प्रचार सुरू झाला.
वास्तविक डलहौसीच्या कारकिर्दीत पोस्ट खाते आणि रेल्वे सुरू झाली तसेच सतीप्रथा बंदी सारखे चांगले निर्णय घेतले गेले. पण राजा हा प्रजेला देवासमान असल्याने संस्थाने खालसा झाल्याने लोकांच्या भावना दुखावल्या. त्यातच बंदुकीच्या काडतुसांना डुकराची व गाईची चरबी लावल्याची अफवाही पसरली. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. त्यामुळे बराकपूर पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी शांत राहणे पसंत केले. इंग्रजांनी ब्रह्मदेशहून गोऱ्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून, अपमानित करून हाकलून द्यायचे ठरवले. हे कळताच या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.
वास्तविक 31 मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र 19 व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा अपमान त्यांना आवडला नाही. 29 मार्च 1857 रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. हे पाहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पाहाताच लेफ्टनंट बॉ घोड्यावरून मंगलवर चाल करून आला. त्याचवेळी मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला.
मंगल पांडेने पुन्हा बंदुकीत गोळ्या भरण्यापूर्वी आधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मात्र मंगल पांडेने तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले. त्यानंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती.
मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पाहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वतःवर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. 8 एप्रिल 1857 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.