नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनाच्या वेळी देशातील रेवडी संस्कृती अर्थात निवडणुकांच्या तोंडावर सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधांवर टीका केली होती. त्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
केजरीवाल म्हणाले, आज आम्ही दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहोत. इतिहासात पहिल्यांदाच या शाळांचा निकाल 99 टक्के लागला आहे. गेल्या काही वर्षांत जवळपास चार लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये दाखल झाले आहेत. सरकारी शाळेतला एक मुलगा गगन याची धनबादच्या आयआयटीएममध्ये निवड झाली आहे. त्याच्या पित्याला 15 हजार रुपये पगार होता. मात्र, लॉकडाऊनमध्येही त्यांची तीही नोकरी गेली.
दिल्लीतील सरकारी रुग्णालये पॉश करण्यात आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकची जगभरात चर्चा आहे. सरकारी रुग्णालयांत भले 50 लाख रुपये खर्च आला तरी चालेल पण प्रत्येक व्यक्तीचा मोफत इलाज केला जातो. हे सगळे करणे म्हणजे काय रेवडी वाटणे आहे का?. ते पुढे म्हणाले की, आम्ही घरटी 200 युनिट वीज मोफत देत असू, महिलांना बसमध्ये मोफत प्रवास करता येत असेल ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला पाठवत असू तर त्यात चुकीचे काय आहे? जे लोक स्वत:साठी हजारो कोटींची विमाने खरेदी करत आहेत, मंत्र्यांना आणि नेत्यांना 3-4 हजार युनिट वीज मोफत देत आहेत तेच रेवडी वाटत आहेत. जर सर्वसामान्य नागरिकाला जर काही सुविधा आम्ही देत आहोत तर त्यात गैर काय आहे?.
मोदी सरकारला लक्ष्य करताना ते पुढे म्हणाले की, मोफत काय आहे ते मी सांगतो. एका व्यक्तीने अनेक बॅंकांकडून कर्ज घेतले. ते फेडलेच नाही. सगळे पैसे फस्त करून टाकले. बॅंका दिवाळखोरीत निघाल्या. त्याने एका राजकीय पक्षाला काही कोटी रुपये देणगी दिली. त्याच्या विरोधात सरकारने काहीच कारवाई केली नाही. तुम्ही तुमच्या मित्रांची हजारो कोटींची कर्जे माफ करतात, त्याला रेवडी वाटणे म्हणतात.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीतून माघार घ्या; प्रकाश आंबेडकरांचे यशवंत सिंन्हांना आवाहन
विदेश यात्रेला गेल्यावर आपल्या काही मित्रांसाठी त्या देशांच्या सरकारांकडून कंत्राटे मिळवली जातात त्याला मोफत रेवडी म्हणतात, असे नमूद करत केजरीवाल म्हणाले की, आज देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. एक प्रामाणिक तर दुसरे भ्रष्ट. आम आदमी पक्षाच्या प्रामाणिक राजकारणात एक एक पैसा वाचवला जातो आहे, तर भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या राजकारणात करोडोंची कंत्राटे दिली जातात. मित्रांना हे ठेके दिले जातात. मंत्र्यांना सगळ्या सुविधा दिल्या जातात आणि सामान्य नागरिकाला काही देणे म्हणजे मोफत रेवडी ठरते. माझी थट्टा केली जातेय, शिव्या दिल्या जात आहेत. मात्र, सामान्य घरातील मुलांना चांगले मोफत शिक्षण देणे चुकीचे आहे का? मी देशाच्या भविष्याचा पाया रचतोय ते चुकीचे करतो आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रेवडी कल्चरच देशाच्या विकासासाठी घातक – पंतप्रधान नरेंद्र मोदी