-अमित डोंगरे
शेन वॉटसनने यंदाच्या स्पर्धेतून निवृत्ती घेत आयपीएलमधील पहिलीच निवृत्ती जाहीर केली. मात्र, त्यावरून अनेक खेळाडू रडारवर आले असून त्यांना आता बाबांनो आता तरी निवृत्ती घ्या, असेच म्हणावेसे वाटते.
ज्या खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर विविध संघांनी विजेतेपदाचे इमले रचले त्याच खेळाडूंचा यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील खेळ पाहून निराशा आली. वॉटसनसह चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, अॅरन फिंच, मोइन अली, मोहित शर्मा, सौरभ तिवारी, केदार जाधव, मुरली विजय, पियुष चावला, इम्रान ताहीर, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, केन विल्यमसन, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर, वरुण ऍरॉन, मनन व्होरा, कर्ण शर्मा, जोश हेझलवूड, रॉबीन उथप्पा, सुनील नरेन, आंद्रे रसेल, सिद्धेश लाड, दीनेश कार्तिक, आदित्य तरे, जयंत यादव तसेच धवल कुलकर्णी ही ठळकपणे घ्यावी लागतील अशी नावे आहेत.
यातील काही खेळाडू भारतीय आहेत तर काही परदेशी. मात्र, या खेळाडूंची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर असे वाटते की, येत्या काळात भारताच्या 19 वर्षांखालील संघातील जवळपास सगळ्याच खेळाडूंना आयपीएलच्या विविध संघांनी पुढील स्पर्धेपासून आपल्या संघाकडून खेळण्याची संधी दिली पाहिजे.
देशात गुणवत्ता आहे, पण त्याला योग्य व पुरेशी संधीच दिली जात नाही. हेच या स्पर्धेने यंदा दाखवून दिले. त्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनीने एका सामन्यातील पराभवानंतर बोलताना नवोदितांमध्ये फारशी चमक दिसली नसल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्याच्या डोळ्यांना चाळिशी लागल्याचे स्पष्टपणे जाणवले होते.
त्याने यंदाच्या स्पर्धेत जे सातत्याने पराभव स्वीकारले व त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले तेव्हा त्याने विविध सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंना संधी दिली त्यांच्यात कोणती चमक दिसली हे चाहत्यांनी प्रत्यक्ष सामन्यांत पाहिले. त्यामुळे एखाद्या खेळाडूचा फॉर्म एखाद्या सामन्यात जाऊ शकतो, पण त्याचा दर्जाच घसरल्याचे या स्पर्धेत अनेक खेळाडूंच्या बाबतीत दिसून आले.
वरिष्ठ खेळाडूंबरोबरच काही नवोदित खेळाडूही आता जमिनीच्या काही इंचवरून चालत असल्याचेही या स्पर्धेने दाखवून दिले. त्यात ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नितीश राणा, हार्दिक पंड्या या व अशा अनेक खेळाडूंनी आत्ता कुठे यश पाहिले होते. मात्र, त्यांचा अॅटिट्युड, अॅरोगन्स पाहिला की राहुल द्रविडच्या शांतपणाचे कौतुक वाटते, पण याच द्रविडकडून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवल्यावरही या खेळाडूंच्या वृत्तीत बदल झाला नसल्याची खंतही वाटते.
शुभमन गील, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, संदीप शर्मा, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती या नव्या दमाच्या खेळाडूंनाच पुढील स्पर्धेपासून विविध संघांनी सातत्याने संधी दिली तरच भारतीय संघाला सेकंड बेच भक्कम मिळेल. एका सामन्यातील खेळीच्या पुण्याईवर कीती दिवस या खेळाडूंचे चोचले पुरवणार, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचे परफॉर्म ऑर पेरीश हे तत्त्व आहे. त्यांच्याकडे खेळाडू जावई होत नाहीत ते पाहुणेच राहतात. आपल्याकडे वारसाहक्क असल्यासारखे खेळाडू संघात निवास करतात. त्यांचा एक ग्रेग ब्लेवेट सुरुवातीच्या सामन्यांनतर अपयशी ठरू लागल्यावर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. जे त्याच्याबाबत घडले तेच मायकल स्लेटरबाबतही घडले. आपल्याकडे असे घडेल का? जोपर्यंत भारतीय संघ कोटा पद्धतीने निवडला जात आहे तोपर्यंत तरी असे अनेक जावई सहन करावे लागतील.
देशाच्या पाचही विभागातील एक असे पाच सदस्य असलेली निवड समिती जो निर्णय घेईल तोच संघ मैदानात उतरेल. इंग्रजांनी सुरू केलेली एकही गोष्ट आपण अद्यापही मागे टाकू शकलेलो नाही. त्यातीलच ही कोटा पद्धत. हीच पद्धत आपल्या क्रिकेटला मारक ठरत आहे.
धोनीसारखा खेळाडू रांचीसारख्या छोट्या गावातून आला तशीच अफाट गुणवत्ता आपल्याकडे आहे.
जुने ते सोने हे अन्य क्षेत्राबाबत ठीक आहे, पण क्रिकेटच्या सामन्यात हे सूत्र वापरले तर पुढील प्रत्येक आयपीएल स्पर्धेत विविध संघांना चेन्नईच्याच वाटेवरून जावे लागेल. त्यामुळे आता संस्थानिक बनलेल्या याच काही खेळाडूंना बाबांनो आता तरी निवृत्त व्हा, असे सांगण्याची वेळ आली आहे.