पुणे – जिल्हाभरात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लग्नात 50 व्यक्तींची उपस्थिती, हॉटेल, रेस्टॉरंट निम्म्या क्षमतेने सुरू, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी तसेच हॉटेल रात्री 10 वाजता बंद करण्याचे आदेश आहेत. प्रत्यक्षात या आदेशानुसार नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निर्बंधाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर शुक्रवारी जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतात. यावेळी ते करोना स्थिती नियंत्रणासाठी उपाययोजना सूचवतात. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देतात. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते. मात्र, ग्रामीण भागात या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.
चेकपोस्टही रिकामे….
प्रामुख्याने शहरालगतची गावे असलेल्या भागांमध्ये मुळशी आणि हवेली तालुक्यामध्ये रात्री उशीरापर्यंत हॉटेल सुरू असतात. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट उभारले होते. आता त्या चेकपोस्टवर पोलिसांची उपस्थिती दिसत नाही.