उर्से – नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेकजण बाहेरगावी निघालेले आहेत. त्यातच विकेंड आणि नाताळ सणामुळे शाळा, महाविद्यालयांना सलग सुट्ट्या आल्याने पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून अवजड आणि जड वाहनांना शनिवार, रविवार आणि सोमवार या तीनही दिवशी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, अस आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवार (नाताळ) अशा सलग तीन सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण लोणावळ्यात पर्यटनासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी मोठी गर्दी लोणावळ्यात होत असते. तीनही दिवशी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सलग सुट्टी आल्यामुळे घाटांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविण्यात येते.
गेल्या वर्षी अवजड आणि कार (हलकी वाहने) हे एकत्र आल्याने पहाटे सहा ते दुपारी बाराच्या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे यावर्षी अवजड आणि जड वाहनांनी घाटामधून दुपारी बाराच्या नंतर प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घाटामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, चालकांचा वेळ वाचेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.