प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती तालुक्यातील तरडोली गावची कन्या रेश्मा पुणेकर भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत चीन येथे होणार्या महिला एशियन कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.थायलंडमध्ये पार पडलेल्या महिला एशिया कप क्वालिफायर स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदक पटकावले होते, आणि त्या संघाचे नेतृत्वही रेश्मा पुणेकर हिनेच केले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तब्बल 12 वर्षे सतत सराव, जिद्द आणि मेहनत घेऊन त्यांनी बेसबॉल क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सामने खेळून त्यांनी महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवून गौरवलेली रेश्मा पुणेकर आज भारतीय संघाची कर्णधार म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पंजाब (लुधियाना) येथे नुकत्याच झालेल्या निवडचाचणीत पुन्हा एकदा भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठीचे सराव शिबिर 15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान लुधियाना येथे पार पडले. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ दिल्लीहून चीनसाठी रवाना झाला आहे. रेश्मा पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या यशामुळे तरडोली गावासह संपूर्ण पंचक्रोशीत अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताचे सामने.. -27 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ताइपे -28 ऑक्टोबर: भारत विरुद्ध थायलंड -29 ऑक्टोबर: भारत विरुद्ध हाँगकाँग -30 ऑक्टोबर: भारत विरुद्ध चीन