निर्णयावर रेल्वे प्रवासी संघटनेची नाराजी
पुणे – लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी काही डबे राखीव ठेवण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल आहे. मात्र डबे राखीव ठेवण्याच्या या निर्णयावर रेल्वे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या डब्यांमध्ये बदल करण्यात येणार असून ओव्हरहेड वाहिन्यांतून मिळणाऱ्या विजेवरच डब्यातील दिवे आणि वातानुकूलित यंत्रणा बसवून एलएचबी (लिंके हॉफमन बोस्च) प्रकाराचे डबे गाड्यांना जोडण्यात येणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कायम महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतो. गाड्यांमध्ये सोयीसुविधा असून देखील महिलांना प्रवास करताना सुरक्षित वाटत नसल्याची भावना अनेकदा व्यक्त करण्यात येते. यानुसार लोकलच्या धर्तीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये काही गाड्यांतील काही डबे महिलांसाठी राखीव ठेवण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. महिला प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य नसल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
महिलांच्या स्वतंत्र डब्यांची व्यवस्था वरवर योग्य वाटत असली, तरी खोलवर विचार करता ती योग्य वाटत नाही. शताब्दी, झेलम, राजधानी, दुरांतो आदी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील राखीव डबे महिलांच्या दृष्टीने योग्य नाही. संपूर्ण डबा नव्हे तर डब्यातील काही भाग महिलांसाठी राखीव ठेवावा. त्याचबरोबर संबंधित डब्यामध्ये कुटुंबासमवेत प्रवास करणाऱ्या महिलाही असाव्यात. याद्वारे सुरक्षा आणि महिलांसाठी राखीव जागा हे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकतील, असे मत प्रवासी संघटनेने व्यक्त केले.