ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचे प्रतिनिधिक पूजन
पुणे – देहू आणि आळंदीहून निघालेल्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतो. भक्ती रसात न्हाऊन हा सोहळा लाखो नागरिक अनुभवतात. मात्र, यंदा या सोहळ्यावर करोनाचे सावट आहे. या पालख्यांचे पुण्यात दरवर्षीप्रमाणे आगमन होणार नाही. याच पार्श्वभूमीवर शहरात बालगंधर्व चौकामध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचे पूजन झाले.
पालख्यांच्या पुण्यातील स्वागताची अनेक संस्थांची दीर्घकालीन परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार संवाद आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवादचे सुनील महाजन, ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आदी उपस्थित होते.
या कालावधीत पुण्यात भक्तीचा महापूर आलेला असतो. परंतु, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे वारकऱ्यांनी देखील पुढाकार घेत दाखवलेला सामंजसपणा आणि समन्वय कौतुकास्पद आहे. सोहळ्याला यंदा अल्पविराम मिळाला असला तरी, पुढील वर्षी त्याच जोमाने आणि उत्साहाने पुणेकर पालख्यांचे स्वागत करण्यास सज्ज राहतील, अशी भावना यावेळी मोहोळ यांनी व्यक्त केली.
पुणेकरांच्या भूमिकेचा धांडोळा इतिहासात घेतला जाईल. त्यावेळी या एकमेव घटनेची नोंद पुणेकरांना सापडेल. तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथांचे प्रातिनिधिक पूजन या घटनेची इतिहासात नोंद होईल. प्रशासकीय पातळीवर विविध संकटांना सामोरे जात असतांना पालखी सोहळ्यांसारखे प्रसंग आम्हा अधिकाऱ्यांना देखील प्रेरणा देतात, असे गायकवाड म्हणाले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले.