पुणे -शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीत महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांमधील (ट्रान्समिशन लाइन) गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे 60 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांची नेमकी गळती शोधण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. सापडलेली गळतीची दुरुस्ती प्रत्येक गुरुवारी तातडीनं केली जाणार आहे. ही गळती शोधण्यासाठी हेलियम गॅस आणि आवाजाच्या ‘सेन्सर’चा वापर केला जाणार आहे. यात 13 ठिकाणी गळती सापडली आहे. तर शहरात महापालिकेच्या जुन्या सुमारे 250 किलोमीटच्या ट्रान्समिशन लाइन असून, त्यात जवळपास 35 टक्के गळती असल्याचा अंदाज आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील या सर्व ट्रान्समिशन लाईनवर फ्लो मीटर बसविले असून, लाईनमध्ये जलकेंद्रातून किती पाणी सोडले आणि पुढे ते किती पोहचले यावरुन गळतीचा अंदाज लावला जात आहे. त्यात, आतापर्यंत 60 किलोमीटच्या लाईन मध्ये सोडलेल्या पाण्यापेक्षा कमी पाणी पुढे गेल्याचे आढळले आहे. त्यामुळे, पालिकेकडून तातडीनं गळती शोधण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणीकपातीमुळे दुरुस्तीसाठी वेळ
खडकवासला धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने शहरात दर गुरूवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी, महापालिकेस पाण्याची सापडत असलेली गळती शोधण्यासाठीही वेळ मिळणे आवश्यक होते. मात्र, पाण्याच्या मागणीमुळे पालिकेस हे काम करता येत नव्हते. पालिकेला वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ते तळजाई टेकडीच्या मुख्य जलवाहिनीची तपासणीत 13 ठिकाणी गळती सापडली. ती मोठ्या प्रमाणात असली तरी त्यासाठी पाणीबंद ठेवता येत नव्हते. मात्र, आता दर गुरूवारी हे काम करता येणार आहे. तसेच टप्प्या टप्प्याने 60 किलोमीटर जलवाहीनीत सापडणारी गळतीही दुरूस्त करून उन्हाळयासाठी पाण्याची बचत करता येणार आहे.
पालिकेकडून गळती शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते काम पुढील आठवड्यात सुरू होईल. तर ज्या भागात गळती सापडेल त्या ठिकाणी दर गुरूवारी काम करणे शक्य होईल. त्यासाठीचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे.
– अनिरुद्ध पावसकर,पाणी पुरवठा विभाग प्रमुख