मुंबई – वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. अकोल्यामध्ये दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या. या धाडींमध्ये व्यावसायिकांकडून पैसे मागितले असल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर या धाड पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा स्विय सहाय्यक दिपक गवळी यांचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे.
अकोल्यात ज्या धाडी टाकण्यात आल्या त्या आपल्याच सांगण्यावरून टाकण्यात आल्या असून त्यात चुकीचे असे काहीच झालेले नाही, असे सत्तार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. पण या प्रकरणावरून सत्तारांच्या मंत्रिमंडळातील हकालपट्टीची मागणी केली आहे.
नाना पटोले म्हणाले, कृषीमंत्री हे किती निर्ढावलेले आहेत. वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी.
अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही. त्यांनी मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतक-यांना धीर दिला नाही अडचणींच्या काळात मदत केली नाही. याऊलट सातत्याने बेजबादार विधाने करून शेतक-यांचा आणि कष्टक-यांचा अवमान केला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळाली पाहिजे याची व्यवस्था करण्याऐवजी कृषीमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे हे अतीशय गंभीर आहे. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, असे पटोलेंकडून सांगण्यात आले आहे.