मुंबई – राज्यात लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून टाळेबंद असलेली प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली करण्यात येणार आहेत. येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास परवाणगी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्यात यावीत अशी जोरदार मागणी करणाऱ्या भाजपतर्फे सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी, “मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत; परंतु राज्य सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.” अशी टीका केली.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
“उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची जी मागणी होती. हिंदुत्व प्रेमी जनतेची मागणी होती. किंबहुना मंदिरावर असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी होती. त्यांचा रेटा दबावाने या ठिकाणी शासनाला निर्णय घ्याव लागला. उशीरा का होईना, घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो.”
खरंतर हा निर्णय अगोदरच व्हायल हवा होता. कारण, जर मंडई, लॉन्स, अगदी रेस्टॉरंट-बार, जिम व इतर सार्वजिनक गर्दीची स्थळं मोकळी केलेली असतील. तर वारकरी संप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने ही भूमिका मांडलेली असताना मला वाटतं हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. वारकरी संप्रदायाच्या मागे हिंदुत्वाच्या भावनेतून भाजपा आहे. परंतु, प्रतिष्ठा व अहंकारापोटी हा निर्णय होत नव्हता. मात्र उशीरा का होईना एक दिलासा या सरकारने दिलेला आहे. याचं मी स्वागत करतो” असं दरेकर म्हणाले.