पुणे -अपघात क्लेमचा दावा वर्षभरात निकाली निघाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 63 लाख रुपये मिळणार आहेत. लोकअदालतमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर आणि ऍड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर हा दावा निकाली निघाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ऍड. सुनिता नवले यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.
गो-डिजिट इन्शुरन्स कंपनीविरोधात हा दाखल केला होता. फेब्रुवारी 2022 मध्ये तो व्यक्ती कंटेनरमध्ये बसून चालला होता. डंपरने त्या कंटेनरला धडक दिली. त्या अपघातामध्ये जागीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो शासकीय सेवेत कार्यरत होता. त्याला दरमहा 55 हजार रुपये पगार होता. भविष्यात पगाराची होणारी वाढ आणि इतर बाबींचा विचार करून अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी ऍड. सुनिता नवले यांनी केली. विमा कंपनीतर्फे ऍड. शेगोरी यांनी काम पाहिले. तर कंपनीचे अधिकारी अजयसिंग जडेजा, अमोल आडगावकर, सुखप्रित सिंग गुरई आणि अमृता सिंन्हा यांनी तडजोडीसाठी भूमिका बजावली.