मुंबई – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये तुलनेने कमी उत्साह जाणवला. या टप्प्यात निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 55.78 टक्के मतदानाची नोंद झाली. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वांधिक 61.33 टक्के मतदान झाले. त्याखालोखाल मतदान (60.50 टक्के) भंडारा-गोंदियामध्ये झाले. चंदपूरमध्ये 55.97, वर्ध्यात 55.36, यवतमाळ-वाशीममध्ये 53.97 तर नागपूरमध्ये 53.13 टक्के मतदान नोंदले गेले. रामटेकमध्ये सर्वांत कमी (51.72 टक्के) मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. राज्यातील पहिल्या टप्प्यात रिंगणात असलेल्या एकूण 116 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. त्यामध्ये नितीन गडकरी आणि हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.