पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. याअंतर्गत २२ हजार जागांसाठी सोमवारी (दि.५) पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यातून शिक्षक भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त सापडणार आहे.
शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी एकूण २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार प्रविष्ट झाले. जून ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या १० टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे.
प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी- इंग्रजी माध्यम वाद, केंद्र शाळेवर साधनव्यक्ती नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती. त्यानंतरही उमेदवारांमध्ये शिक्षक भरतीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या १६ हजार जागा मुलाखती न घेता भरण्यात येणार आहेत. खासगी शिक्षण संस्थांमधील ६ हजार जागा मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत. या जागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत. भरती प्रक्रियेबाबत सविस्तर वेळापत्रकही जाहीर होणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे ८०० जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही, तर खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवर सुद्धा उमेदवारांना शिक्षकांची नोकरी मिळणार आहे.