मुंबई – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. तर जवळपास सर्वच पक्षांसमोर बंडोखोरांचे आव्हान कायम असल्याचे दिसून आले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी उसळली होती. भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून काल सांगलीच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देखील सांगली जिल्ह्यातीलच अरुण लाड यांना मैदानात उतरवण्यात आले. तर कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आजगावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकडून देखील आज पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
भाजपकडून आपल्याला महत्त्व दिले जात नसल्याने आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करीत काल अनेकांनी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल आणि त्यांची बंडखोरी निवळेल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवर नुकतीच भाजपची टर्म प्राध्यापक अनिल सोले यांनी पूर्ण केली होती आणि ते ही उमेदवारीच्या रेसमध्ये होते. ते जेव्हा इतर नेत्यांबरोबर पोहचले नाही तेव्हा ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज कॉंग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित वंजारी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार असल्याचा दावा यावेळी कॉंग्रेस नेत्यांकडून करण्यात आला.
मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांची तसेच नागपूर शहरातील स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती खटकणारी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून फक्त माजी मंत्री रमेश बंग, तर शिवसेनेकडून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने अर्ज दाखल करताना उपस्थित होते.