Loksabha Election 2024 | यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये रंगतदार लढती होणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असून सामान्य मतदार आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशातच महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस यांच्यामध्ये सांगलीच्या जागेवरून जुंपली होती. मात्र या वादावर तोडगा निघाला असून काँग्रेसला ही जागा सोडावी लागली आहे. सांगली येथून उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी याला कडाडून विरोध केला होता. ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेसाठी दिल्ली गाठली. मात्र दिल्लीतूनही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.
सांगलीत मविआकडून चंद्रहार पाटील या उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात गेल्या पंधरा दिवसापासून चुरस कायम असून काँग्रेसने सांगलीच्या जागेवर हक्क सांगत आपली नाराजी कायम ठेवली आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या मविआच्या बैठकीत चंद्रहार पाटील यांनी थेट आव्हान दिल्याची माहिती समोर येत आहे. ते म्हणाले,’माझी व माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मात्र, शेतकर्याचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे पुढे येऊन सांगावे असे आव्हान चंद्रहार पाटील यांनी दिले.
ते पुढे म्हणाले,’मविआमधून चार वेळा माझी उमेदवारी जाहीर होउनही काँग्रेस अद्याप दूर आहे. उमेदवारीवरचा हक्क सोडण्यास राजी होत नाही. काँग्रेसचे नेमके दुखणे काय हे कळत नाही. शेतकर्याचा मुलगा खासदार होतोय हे दुखणे आहे की, शिवसेनेचा खासदार होतोय हे दुखणे आहे हेच कळत नाही. काँग्रेसचे वागणे पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. त्यांनी पुढे येउन काय ते स्पष्ट करावे असेही ते म्हणाले आहे.
हे वाचले का ? ‘भाजप तुम्हाला चहाच्या जागी ‘गोमूत्र’ प्यायला तर दुपारच्या जेवणात ‘गोबर’ खायला सांगेल’ ममता बॅनर्जींची खोचक टीका