प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाचा निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात निर्देश दिले.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील 2152 विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्याच्या कारवाईत त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षेचा निकाल १७ जुलैला जाहीर झाला. या सत्रात 36 हजार 201 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 2152 विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले.दरम्यान, मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेरपरीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार 23 ऑगस्ट 2025 रोजी पुरवणी परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना ही विशेष संधी दिली जात आहे.