RCB’s home ground could be Pune in IPL 2025 : रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने २०२५ मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून १७ वर्षांचा दुष्काळ संपवला. या ऐतिहासिक विजेतेपदानंतर आगामी हंगामातील त्यांचे सर्व सामने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरच खेळले जातील, अशी अपेक्षा चाहत्यांना होती; मात्र आता बंगळुरूच्या क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, आरसीबीचा संघ आगामी आयपीएल २०२६ हंगामासाठी आपले ‘होम ग्राउंड’ बदलण्याची दाट शक्यता आहे. सुरक्षेच्या धोक्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रश्नचिन्ह: पुण्यात खेळणार सर्व सामने? ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीचा संघ घरच्या मैदानातील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मैदानावर खेळू शकतो. सुरक्षेचे कारण: जून २०२५ मध्ये आरसीबीने पहिले जेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या विजयोत्सवात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. या दुर्देवी घटनेनंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. या सुरक्षेच्या कारणामुळेच महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील या मैदानावर नियोजित सामनेही इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. याच कारणामुळे आता आरसीबीवर आपले घरचे मैदान बदलण्याची वेळ येऊन ठेपल्याचे चित्र आहे. एमसीएकडूकडून पुण्यात सामने घेण्याचे संकेत – या बदलाबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पाई यांनीही संकेत दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, “आरसीबी संघाचे घरच्या मैदानातील सर्व सामने पुण्यात खेळवण्याबाबत चर्चा सुरू आहे, पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. कर्नाटकमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही आमचं स्टेडियम (पुण्यातील एमसीए) वापरण्यासाठी ऑफर केलं आहे. काही तांत्रिक बाबी निश्चित व्हायच्या आहेत, पण सर्व काही सुरळीत झाले तर आरसीबीचे सामने पुण्यात खेळले जाऊ शकतात.” हेही वाचा – Rashid Khan : …अखेर राशिदने ‘त्या’ मिस्ट्री गर्लबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘ती माझी दुसरी…’, पाहा VIDEO आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मोठा बदल? आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबी संघ स्पर्धेत सहभागी आहे आणि २००९ मध्ये संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवल्याचा अपवाद वगळता, प्रत्येक हंगामात त्यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमलाच आपले ‘होम ग्राउंड’ म्हणून वापरले आहे. मात्र, आगामी हंगामात (IPL 2026) जर हा बदल निश्चित झाला, तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीचा संघ आपले सर्व घरचे सामने दुसऱ्या मैदानावर (पुण्यात) खेळताना दिसू शकतो.