मुंबई – रशिया- युक्रेन युद्ध निवळत चालल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून शेअर बाजार निर्देशांकामध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे कंपन्यांचे बाजारमूल्य वेगाने वाढून पूर्वपदावर येण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 1.83 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. आता मुंबई शेअर बाजारावर नोंदल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 251 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. रशियाने यूक्रेन विरोधातील भूमिका काही प्रमाणात मवाळ केली आहे. त्याचबरोबर युक्रेनेही आपली भूमिका मवाळ केली आहे. या दोन्ही देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लवकरच चर्चा करणार आहेत.
त्यामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांकांना चांगलाच आधार मिळत आहे. युद्ध मंदावत असतानाच भारतामध्ये उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय राजकारण स्थिर राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांना सकारात्मक वाटत आहे असे विश्लेषकांनी सांगितले.
युद्ध मंदावणार असल्यामुळे क्रुडचे दर कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेला चांगला आधार मिळेल. मात्र अमेरिकेतील व्याजदरवाढ अटळ असल्यामुळे त्याचा परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराच्या भारतीय गुंतवणुकीवरील परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.