रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे. तशीच ती लोककलाही आहे. शुभकार्य आणि रांगोळी यांचं अतूट नातं आहे. रांगोळी मनाला प्रसन्नता देते. अंगणातली रांगोळी स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असते. सुरुवातीला रंग नव्हते तेव्हा रांगोळी पांढरी ठेवू नये म्हणून हळद-कुंकू घातले जायचे. नंतर रांगोळ्यांमध्ये रंग आले. विशेष म्हणजे काळानुसार रांगोळीचे प्रकार बदलले. आधी स्त्रिया फक्त ठिपक्यांची रांगोळी काढायच्या कारण तशीच पद्धत होती.
पूर्वी एखाद्याच्या घरी शुभकार्य आहे हे दारात काढलेल्या रांगोळीवरून कळायचं. सणवार तर रांगोळीशिवाय साजरेच होत नाहीत. त्याकाळी स्त्रियांना आपली कला दाखवायची तेवढीच संधी असायची. एकमेकींमध्ये जणू चढाओढच असायची. केळवण, डोहाळेजेवण याप्रसंगी तर रांगोळीशिवाय बातच नाही.
आता मात्र रांगोळीचे रूपडंच पालटले. काही स्त्रियांना रांगोळी काढता येत नसल्याने रांगोळीचे साचे मिळायला लागले. अगदी लक्ष्मीच्या पावलांपासून सगळ्यांचे. हल्ली एखाद्या थोर व्यक्तींच्या सन्मानार्थ त्यांची रांगोळी रस्त्यावर, हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात काढली जाते. यावेळी अनेकजण धार्मिक सणाप्रसंगी रांगोळी काढून पैसे कमावतात. पालघर जिल्ह्यातील एका गावातील सर्व कुटुंबातील सर्व व्यक्ती रांगोळी काढतात. एकाहून एक सरस रांगोळी काढतात. कलावंतांचं गावच म्हणावं लागेल.
पानाफुलांच्या रांगोळ्यांवरून मोर, बदक, पोपट यांच्या रांगोळ्या काढल्या जाऊ लागल्या. रांगोळी स्पर्धा भरू लागल्या. सार्वजनिक सण-उत्सवाच्या मिरवणुकीत रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात.
खूप जणांना आपलं आयुष्य हे ठिपक्यांच्या रांगोळीसारखं असावं असं वाटतं. आखीव रेखीव, कुठे काही वेडेवाकडं घडायला नको. सारं काही मनासारखं घडावं. आपण जे ठरवू ते आणि तसंच व्हावं. पण असं होतं का? प्रत्येकाने आपल्या आयुष्यात डोकावून बघावं. विकसित तंत्रज्ञानाचे जसे इतर अनेक फायदे आहेत, यातून जशा इतर अनेक गोष्टी शिकता येतात तशा रांगोळ्यासुद्धा शिकता येतात.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या साहाय्याने रांगोळ्या काढल्या जातात. उदाहरणार्थ, डाव, चमचे, थाळी याच्याभोवती रांगोळी ठेवून त्याला फुलापानांचे आकार दिले जातात. भरीव रांगोळी काढली जाते ती दिसतेही खूप सुंदर. पण रांगोळीविषयी एक फार वाईट वाटतं. रांगोळी पुसून टाकावी लागते. इतके श्रम वाया जातात. बरं तशीच कलाकृती पुन्हा हातून घडेल की नाही हे सांगता येत नाही. तरी सध्या मोबाइलमध्ये फोटो काढून ठेवता येतात, त्यात तिची आठवण जपून ठेवता येते.
या रांगोळीला हिंदीत “रंगोली’, बंगाली भाषेत “अल्पना’ आणि गुजराथीत “रंगावली’ म्हणतात. देशातल्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रथा आहेत. बंगालमध्ये तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात, तर महाराष्ट्रात पिठाची रांगोळी चांगली मानली जात नाही. आदिवासी लोककलेत वारली पद्धतीने रांगोळी काढली जाते.
पूर्वी रांगोळी ही फक्त स्त्रियांची मक्तेदारी होती. विवाहोच्छुक मुलीला रांगोळी यायलाच हवी, अशी अट असायची. आता मात्र रांगोळी ही एक कला समजली जाऊन पुरुषही त्यात निपुण झाले आहेत.
रांगोळी काढण्याचे शिक्षण दिले जाते. थर्माकोल, पुठ्ठा यांच्या तयार केलेल्या रांगोळ्या पानाभोवती शोभा म्हणून ठेवल्या जातात. पूर्वी घरापुढे मोठं अंगण असायचं त्यामुळे मोठ्या रांगोळ्या काढता यायच्या. आता घरं लहान झाली, अंगण तर बादच झालं त्यामुळे गॅलरी, घरापुढची छोटी जागा यात रांगोळ्या काढल्या जातात.रंग भरल्यावर रांगोळी जशी सुंदर दिसते तसंच आयुष्य जगण्याचं असतं. त्यात आपण रंग भरले की जगणं सुंदर होऊन जातं.
डॉ. नीलम ताटके