पुणे- “चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असले, तरी त्यांना मिशन पूर्ण करण्यासाठी पुण्यात पाठवले असून, ते पूर्ण करून ते परत जातील. सध्याच्या सरकारमध्ये बिघाडी असल्याने अजित पवार पुन्हा एकदा आमच्यासोबत येतील. त्यामुळेच फडणवीस हेही पुन्हा येईन, असे म्हणतात. उद्धव ठाकरे यांची मोठी कसरत होत असून, कॉंग्रेस एक दिवस पाठिंबा काढून घेईल आणि पुन्हा आम्ही सत्तेवर येऊ, अशा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजय सोनावणे, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे राज्याचे सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, ऍड. अयुब शेख, असित गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीत रिपाइंला जागा मागणार असून, त्यासाठी लवकरच चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. पश्चिम बंगालमध्येही चार ते पाच जागा आम्ही मागत आहोत. तिथे भाजपाची सत्ता येणार असून, 200पेक्षा अधिक जागांवर भाजप विजयी होईल,
“शेकऱ्यांच्या प्रश्नांची आम्हालाही जाण आहे. परंतु कायदा रद्द करण्याच्या मागणीला आम्ही सहमत नाही. संविधानानुसार केलेला कायदा रद्द झाला तर इतर अनेक कायदे रद्द करण्याच्या मागणीला जोर येईल आणि त्यातून लोकशाही आणि संविधानाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेतून या कायद्यात काही बदल असतील, तर ते सुचवावेत. कायद्यात बदल करणे शक्य आहे. मात्र, संसदेने केलेले कायदेच रद्द करा, असे म्हणणे संयुक्तिक नाही. कॉंग्रेस शेतकरी नेत्यांना फूस लावत आहे. शेतकरी आंदोलन राजकीय झाले आहे,” असेही आठवले यांनी सांगितले.
आता …नो करोना
करोना आला तेव्हा मी ‘गो करोना’ म्हणालो होतो. परंतु, करोना गेला तर नाहीच; शिवाय त्याने मलाही पकडले. त्यामुळे आता नव्याने येत असलेल्या करोनासाठी ‘नो करोना नो करोना’ एवढंच सांगेल,” अशी मिश्किल टिप्पणी आठवले यांनी केली.