बेंगळुरू : पहलगाम हल्ल्यावेळी मारेकऱ्यांनी गोळ्या घालण्यापूर्वी कोणाचाही धर्म विचारला असेल असे वाटत नाही. गोळीबार करणारा माणूस जात किंवा धर्म विचारेल का? तो फक्त गोळीबार करेल आणि निघून जाईल. या भयानक हल्ल्यामुळे देश अस्वस्थ आहे आणि त्याला धार्मिक मुद्दा म्हणून सादर करण्याचा कट रचला जात आहे असा आरोप कर्नाटकचे उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी केला आहे. तिम्मापूर असेही म्हणाले की, मला वाटते जेव्हा ते दहशतवादी हल्ला करत होते तेव्हा त्यांनी कोणालाच धर्माबद्दल विचारले नव्हते. जर त्यांनी विचारले असते तर धर्माच्या आधारावर या मुद्द्याचे राजकारण करण्यासाठी अशा विधानाचा वापर करण्याचा वेडेपणा झाला नसता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाकिस्तानशी युद्धाच्या बाजूने नसल्याचे विधान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने त्यांच्या विधानाने आणखी एक वाद निर्माण केला आहे.