Mango And Cashew Farm Owners Protest – कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शुक्रवारी मुंबईत मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना आणि नेत्यांना पोलिसांनी गिरगाव चौपाटीवरच रोखून ताब्यात घेतले. यामुळे आंदोलक शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्यापर्यंत हा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत नेत्यांना व्हॅनमध्ये भरले. पोलिसांच्या कारवाईवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता, तरीही पोलिसांनी धक्काबुक्की करत आणि दमदाटी करत आम्हाला ताब्यात घेतले. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आक्रोश करत आहे, पण मुख्यमंत्री तीन-चार वेळा कोकणात येऊनही त्यांनी साधे निवेदन स्वीकारले नाही. ५० वर्षांत पहिल्यांदाच कोकणातील शेतकरी रस्त्यावर उतरला असून सरकार त्याच्या वेदना समजून घेण्याऐवजी दडपशाही करत आहे, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. आंदोलनाचे कारण : अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली २२ हजारांची मदत अत्यंत तोकडी असून, भरीव आर्थिक पॅकेज मिळावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यास सांगितले होते, मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यावर आंदोलक ठाम राहिल्याने हा संघर्ष निर्माण झाला.