नवी दिल्ली – करोनाच्या संकटकाळात केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत केली जात आहे. तरीदेखील येथील करोनाबाधित रुग्ण संख्येवर राज्याला नियंत्रण मिळविता आलेले नाही. सद्यपरिस्थिती पाहता महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू असल्याचे दिसते, अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. महाराष्ट्रात करोनाच्या संकटात जे काही सुरू आहे ते अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.
भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, या सरकारची सूत्रे शरद पवारांच्या हाती आहेत, तरीही असे घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का? महाराष्ट्र करोनाच्या बाबतीत आता चीनला मागे टाकेल. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सोनू सुदच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अभिनेता सोनू सुद लोकांना चांगली मदत करतोय तर शिवसेनेला तेही बघवत नाही, त्याच्यावरही टीका करण्यात आली. शिवसेनेला काय झालंय? आम्ही पाहात होतो ती बाळासाहेबांची शिवसेना हीच आहे का? असा प्रश्न आम्हाला पडतो. आमच्यासोबत शिवसेनेने विधानसभेची निवडणूक लढली त्यानंतर आम्हाला धोका दिला. आम्ही धोका दिला हरकत नाही. मात्र, आम्ही धोका कुणालाही देऊ शकत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
ही तर कॉंग्रेसची जुनी परंपरा
या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही. राजकारण समाजाच्या सेवेसाठी केले जाते. राजकारण हे स्वार्थासाठी केले जात नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये आहोत, पण आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे तर संकटाच्या काळात पळ काढणे झाले. जबाबदारी झटकणं आले. जबाबदारी झटकून टाकणं ही तर कॉंग्रेसची जुनी परंपरा आहे, असेही ते म्हणाले.