बुलंदशहर – कॉंग्रेस सरकारच्या काळात नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांनी देश लुटला. चौकीदाराचे सरकार आल्याचे समजताच ते देश सोडून पळून गेले, असा आरोप राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेसवर केला.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आयोजित सभेत राजनाथ सिंह बोलत होते. नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी हे तिघेही बॅंकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस निवडणुकीच्या काळात भाजपाला लक्ष्य करत आहे.
भाजपच्या काळात या तिघांवर परदेशात कारवाई झाल्याचे मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळातच तिघांनी देश लुटला आणि भाजप सरकार येताच देश सोडला. मात्र, चौकीदार त्यांना सोडणार नाही. सरकारच्या कारवाईनंतर नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चोक्सी यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचं काम सुरू आहे.