Rajnath Singh : पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला इशारा देत केली ‘ही मोठी घोषणा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी दुपारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.
महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. संजय लेले, कौस्तुभ गनबोटे, अतुल मोने, हेमंत जोशी, दिलीप दिसले, संतोष जगदाळे असे मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ
दरम्यान जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे.





