मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मास्कसक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मास्कसक्ती करावी की नाही. यावर चर्चा झाली आहे. राज्यात दररोज 25 हजारांपर्यंत करोना टेस्टिंग केल्या जात आहे. ही टेस्टिंग संख्या निश्चितपणे वाढली जाईल, महाराष्ट्र करोनाचे किरकोळ रुग्ण असून खूप सेफ झोनमध्ये आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत करोना स्थितीचा आढावा घेतला. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील स्थितीबाबत माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, राज्यातील करोना स्थिती नियंत्रणात आहे. पण गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार आहे. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क सक्ती करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
करोनामुळे पॅनिक होण्याची गरज नसून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. राज्यात सध्या 929 सक्रीय करोनाबाधित आहेत. पर मिलियनमध्ये करोनाच्या ऍटिव्ह केसेसमध्ये महाराष्ट्र खूप खाली आहे. मिझोराम 635, दिल्ली 248, केरळ 82, हरियाणा 73, उत्तराखंड 44, कर्नाटक 28 आहे. परंतु महाराष्ट्रात 7 आहे. देशातील दर 10 लाख केसेसमागे महाराष्ट्रात फक्त 7 केसेस आहेत. त्यामुळे काळजीसारखा विषय नाही.
परंतु पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या आणि कारवाई करा, यासंदर्भात आम्ही सर्वप्रथम टेस्टिंग वाढवू, क्लस्टर भागातील रुग्णसंख्येचे ट्रॅकिंग करू, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचेही ट्रॅकिंग करू, उपचार करु त्याबरोबर पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे जीनोम सिक्वेसिंग करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.