कोल्हापूर – मराठा समाजाची अवस्था ही कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेंद्र कोंढरे म्हणाले की, सगळी सत्व मराठा समाजानेच द्यावी अशी काहींची भूमिका आहे. मात्र, हे चुकीचे असून प्रत्येकवेळी मराठा समाजच समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे असे कोंढरे म्हणाले.
एमपीएससी मध्ये यशस्वी होणारे तरूण हे केवळ एक टक्का आहेत. खासगी क्षेत्रात देखील तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी अशी मागणीही यावेळी कोंढरे यांनी केली.
राज्य शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. या परिक्षेसाठी 2 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना कोंढरे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांनी फक्त स्पर्धा परिक्षेकडेच लक्ष न देता इतरही क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे. तसेच समाजातील जे गर्भश्रीमंत आणि मध्यमवर्गीय आहे त्यांनी समाजातील
तरूणांना मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसानंतर रोजगार नसलेले तरूण दगड घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतील, असे कोंढरे म्हणाले.
छत्रपती घराण्याबाबत प्रकाश आंबेडरांनी आदर ठेवायला हवा असेही राजेंद्र कोंढरे म्हणाले.