मात्र, मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा नामंजूर
जयपूर – देशातील काही राज्यांप्रमाणेच राजस्थानातही कॉंग्रेसची लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्या राज्याचे कृषिमंत्री लालचंद कटारिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा नामंजूूर केला.
लोकसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर राजस्थानमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. त्या पीछेहाटीची जबाबदारी निश्चित केली जावी, अशी भूमिका कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली. त्यातून त्यांच्या निशाण्यावर थेट गेहलोत असल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसमधील धुसफूस थांबण्याची चिन्हे नसतानाच कटारिया यांनी गेहलोत यांची भेट घेऊन कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला.
मात्र, गेहलोत यांनी कटारिया यांची समजूत काढत त्यांना चांगले प्रशासन देण्याच्या कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कटारिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांचे राजीनामापत्र सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले. मात्र, कटारिया यांनी राजीनामा दिल्याच्या बाबीचा मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि राजभवनाकडून इन्कार करण्यात आला होता.