Rajasthan election results : मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का; राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल जाहीर
Rajasthan election results : भजनलाल, वसुंधरा यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा वरचष्मा, ९,९०० वॉर्डांच्या निकालात भाजप ४,०२६, काँग्रेस ३,४३८ जागांवर विजयी; दोन वॉर्डांत भाजप उमेदवारांना मिळाले फक्त एक-एक मत

Rajasthan election results : राजस्थानमधील ३०९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ९,९०० वॉर्डांच्या निकालात भाजपने ४,०२६, काँग्रेसने ३,४३८, तर अपक्ष उमेदवारांनी २,४३६ वॉर्ड जिंकले आहेत. एकूण आकडेवारीत भाजप आघाडीवर असली तरी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्यासह पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का बसला आहे.
राजस्थानमध्ये ३०९ महापालिका, नगर परिषद आणि नगरपालिकांसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ९ सप्टेंबरला १६२ संस्थांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात ११ सप्टेंबरला १४७ संस्थांसाठी मतदान झाले. दोन्ही टप्प्यांत एकूण १०,१६७ वॉर्डांसाठी मतदान झाले.
वसुंधरा राजेंच्या गडात भाजपला धक्का –
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या प्रभावाच्या झालावाड जिल्ह्यात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. झालावाड नगर परिषदेत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. खानपूर, भवानीमंडी आणि डगमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली. झालरापाटन, मनोहरथाना आणि अकलेरा येथे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पिडावामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली.
मुख्यमंत्री भजनलाल यांच्या भरतपूरमध्येही भाजप पिछाडीवर –
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या भरतपूरमधील सहा नगरपालिकांच्या निकालात भाजपला मोठा धक्का बसला. येथे भाजपला २०, काँग्रेसला ७, तर अपक्ष आणि इतर उमेदवारांना ३८ जागा मिळाल्या. त्यामुळे भरतपूरमध्ये अपक्षांचे वर्चस्व दिसून आले.
भाजपच्या इतर बड्या नेत्यांच्या गडातही पराभव –
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्या पालीमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक जागा जिंकल्या. येथे भाजपला २१, काँग्रेसला २९ आणि इतरांना १५ जागा मिळाल्या.
केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या बीकानेरमध्येही काँग्रेसने आघाडी घेतली. भाजपला २७, तर काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या. अजमेरमध्ये विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनाही पक्षाचा गड राखता आला नाही. येथे भाजपला ३२, तर काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या. मात्र, कोट्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रभावामुळे भाजपला आपली कामगिरी टिकवता आली.
भाजपच्या दोन उमेदवारांना फक्त एक-एक मत –
या निवडणुकीत भाजपच्या दोन उमेदवारांची कामगिरी विशेष चर्चेत आली आहे. परबतसर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील भाजप उमेदवार कैलाशचंद यांना केवळ एक मत मिळाले. या प्रभागात काँग्रेसच्या हीना खानम यांनी ३७६ मते मिळवत विजय मिळवला. अपक्ष राशिद खान यांना १९५ मते मिळाली.
धौलपूर जिल्ह्यातील सैपऊ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजपचे उमेदवार लक्ष्मण कोली यांनाही केवळ एक मत मिळाले. येथे अपक्ष अजय कुमार यांनी १०८ मते मिळवत विजय मिळवला, तर अपक्ष राजेश कुमार यांना ६९ मते मिळाली.
एकीकडे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रभावक्षेत्रातील निकालांनी पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. भाजपकडून या निकालांना मोठा विजय आणि जनतेचा पक्षावरील विश्वास असे म्हटले जात आहे.





