Raj Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदाणींना देण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे गटाने मुंबईत मोर्चा काढला होता. त्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप देखील झाले. दरम्यान आता या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. त्यासोबतच त्यांनी अदानींनाच मुंबईतील (mumbai) मोठा प्रकल्प कसा मिळाला? त्यांच्यामध्ये असे काय आहे, की विमानतळ हाताळणं असो किंवा कोळसा… सर्व त्यांनाच कसं मिळतं? भारतात दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे.
मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी, “मुंबईमध्ये एक मोठा प्रकल्प येतोय. तो परस्पर अदानींना का दिला? हा प्रश्न आहे. अदानी यांच्यामधे काय आहे की त्यांच्याकडेच विमानतळ, कोळसा, रिडेव्हलपमेंट सगळे मोठे प्रोजेक्ट आहेत. मुंबईत अनेक मोठे कंत्राटदार आहेत. त्यांना निविदा काढून प्रकल्प द्यावा ना? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पुढे राज ठाकरे यांनी धारावीमध्ये काढण्यात येत असलेल्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “कंत्राट काढून १० महिने झाले, आज का मोर्चा काढला जातोय ? की सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा.” रिडेव्हलपमेंटसाठी एक प्लान असतो, तो त्यांच्याकडे आहे का? हे अदांनीना विचारा. शाळा किती, ओपन स्पेस किती? सगळं माहिती पाहिजे, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, आपल्या पक्षाची भूमिका मांडत असताना आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आम्ही सुरु केल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. याविषयी बोलताना, “आमची लोकसभेसंदर्भात बैठक झाली. कोणते मतदारसंघ लढवायचे त्यासंदर्भात सखोल चर्चा झाली.असे सांगताना महानगरपाालिका निवडणुका 2025 ला होतील, असे उपहासात्मक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. कारण सध्या देशात मेरी मर्जी सुरू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.