पुणे – राज्यात आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाचा आता लवकरच परतीचा प्रवास सुरू होणार आहे. महाराष्ट्रातून 24 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे. मात्र, त्यापूर्वी 20 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने आंध्र प्रदेश-तेलंगणा-महाराष्ट्र असा प्रवास करत 15 ऑक्टोबरला अरबी समुद्रात दाखल झाला. या स्थितीच्या प्रभावामुळेच आठवडाभरात या तिन्ही राज्यांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचबरोबर 19 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या पट्ट्याचा राज्यात प्रभाव अद्यापही कामय असून, पुढील दोन दिवस राज्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.