गुजरातमध्ये पावसाचा तांडव, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, 17800 जणांची सुटका

Gujarat Rains News । गुजरातमध्ये पावसाचा तांडव सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे तीन दिवसांत पावसामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी पूरग्रस्त भागातून 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
मोरबी जिल्ह्यातील हलवद तालुक्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या सात जणांचा मृत्यू झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या पुलावरून पाणी वाहत होते. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वडोदरा येथे पाऊस थांबला असूनही, शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीने किनारी तोडून निवासी भागात प्रवेश केल्याने सखल भागात आणि इमारती, रस्ते आणि वाहनांमध्ये पाणी साचले आहे.
Gujarat Rains News । पीएम मोदींनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली
गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सौराष्ट्र विभागातील देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 6 ते 12 तासांच्या कालावधीत 50 मिमी ते 200 मिमी पाऊस झाला. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील भानवड तालुक्यात या कालावधीत 185 मिमी पाऊस झाला, जो राज्यातील सर्वाधिक आहे.
Gujarat Rains News । गुरुवारीही मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सौराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. अधिका-यांनी सांगितले की वडोदरा शहरातील घरांमध्ये आणि छतावर अडकलेल्या लोकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि लष्कराच्या तीन तुकड्यांद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
मंत्री हृषिकेश पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, वडोदरामधून आतापर्यंत ५,००० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि १२०० इतरांना वाचवण्यात आले आहे. बुधवारी लष्कराच्या तीन अतिरिक्त तुकड्या आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली होती.





