उत्तरा बरसल्याने बळीराजा सुखावला : अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा
नगर – दुपारी 1 च्या सुमारास झालेल्या पावसाने शहरास चांगलेच झोडपून काढले या पावसाने शहरातील सखलभागात पाणी साठल्याने जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले. मात्र हा पाऊस फक्त शहर परिसरात झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. सकाळी शहर परीसरात लख्ख ऊन पडले होते, मात्र दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांचीगर्दी झाली आणि सरी बरसू लागल्या. अचानक झालेल्या पावसाने नगरकरांचे जनजीवन ठप्प करून टाकले.
शहराच्या सखलभागात पाणी साचू लागले काही वेऴातच न्यू आर्टस महाविद्यालयाजवळ फूटभर पाणी साठले. तर गावातील सखल भागाकडे वाहिलेल्या पाण्यामुळे चितळे रस्ता चौपाटी कारंजा ,गांधी मैदान ,लक्ष्मी कारंजा या भागातून पाणी गौरी घुमट , पटवर्धन चौकापर्यंत आले. शहरातील सखल भागातून वाहिलेले पाणी या भागात एकत्र होवून पुढे नालेगाव पर्यंत नदी सारखे वाहते. चौपाटी कारंजा ते झारेकर गल्लीपर्यंत साचलेल्या फूट दीडफूट पाण्यातून वाट काढतांना वाहन धारकांची चांगलीच त्रेधा उडाली.
शहरात पाऊस झाल्याचे ऐकल्यावर उपनगरातील नागरीकांच्या भुवया उंचावण्याचा प्रसंग आज घडला त्याचे कारणही तसेच होते कारण जेव्हा नगर शहरात पाऊस सुरू होता त्यावेळी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावेडी उपनगराच्या काही भागात पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बरोबर या उलट म्हणजे पाइपलाइन भागात धुवाधार पाऊस पडला त्यावेळी नगर शहरात अजिबातच पाऊस नसल्याच्या अनुभवाला अनेकांनी उजाळा दिला.
त्यानंतर सायंकाळी शहर,सावेडी उपनगरासह राहुरी पर्यंत तर केडगाव पासून ते सुप्या पर्यंत जोरदार पाऊस बरसला आज झालेल्या पावसाने या परीसरातील बळी राजा मात्र सुखावल्याचे चित्र आहे.पावसाळ्यातील बहुतांश नक्षत्रे कोरडीच गेल्याने शेतकरी रडकुंडीला आला होता. मात्र आता रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी अजून दोन तीन मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. आपल्याकडे परतीचा पाऊसच चांगला होत असल्याने आगामी काळातील नक्षत्रे ही चांगलीच बरतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.
मनपा कारभाराचे निघाले वाभाडे
रस्त्यांच्या बाबतीत मनपाच्या कारभाराचे पुरते वाभाडे निघाले. रस्त्यातील खड्ड्यांत पाणी भरल्याने वाहने त्यात आदळत होती. या रस्त्यातून मार्ग काढताना कळत – नकळत पालिकेच्या कारभाराचा उद्धार होत होता. शिव्यांची लाखोली वाहात नागरिक कसेबसे आपले वाहन या रस्त्यातून काढत होते.
पालकांची त्रेधा…
शाळा सुटण्याच्या वेळेसच पाऊस झाल्याने शाळकरी चिमुकल्यांची आणि त्यांच्या पालकांची चांगलीच त्रेधा उडाली.छत्री, रेनकोट आणि मुलांना सावरत घरी नेताना पालकांनाही मोठी कसरत करावी लागली.