- पुणेविभागातर्फे गेल्या वर्षभरात सुमारे दीड लाख टन मालवाहतूक
पुणे – प्रवासी सेवेसह रेल्वेला उद्योगक्षेत्राकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात पुणे विभागांतर्गत मालवाहतुकीचे प्रमाण 105 टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहननिर्मिती क्षेत्राकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, विभागातर्फे गेल्या वर्षभरात सुमारे दीड लाख टन मालवाहतूक झाली आहे. त्यातून मिळणारे उत्पन्नदेखील वाढल्याची माहिती रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दिली.
मार्चच्या अखेरीस विभागातर्फे कामकाज अणि उत्पन्नाबाबत आढावा घेण्यात आला. याबाबत माहिती देण्यासाठी रेल्वे विभागातर्फे आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत शर्मा यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.
शर्मा म्हणाल्या, “गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालवाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: नव्याने समाविष्ट वस्तूंच्या (एनएमजी) वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यातून विभागाला तब्बल 18.50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.’
विभागातर्फे वाहतूक केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये साखरेचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर वाहनांचीदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक केली. यंदा मालवाहतूक गाड्यांचे प्रमाणही वाढले आहे. 2020मध्ये केवळ 48 गाड्यांद्वारे वाहतूक झाली होती. यंदा हे प्रमाण 102 गाड्या इतके होते. त्यामुळेच रेल्वेच्या कामकाज आणि उत्पन्नाच्या दृष्टीने यंदाचे आर्थिक वर्ष हे उत्तम असल्याची भावना शर्मा यांनी व्यक्त केली.
रेल्वेच्या वेळापत्रकातील बदलांबाबत अद्याप सूचना नाही
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे विभागातर्फे गाड्यांबाबत काही बदल केले आहेत का? असे विचारले असता, अद्याप याबाबत रेल्वेच्या मुख्यालयातून कोणतीही सूचना आली नसून, तुर्तास गाड्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. मात्र, गेल्यावर्षी पुन्हा सुरक्षिततेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे रेणू शर्मा यांनी सांगितले.
पुणे विभागांतर्गत 140 सीसीटीव्ही बसविले
निर्भया सुरक्षा योजनेंतर्गत रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वेस्थानकांवर सुमारे 539 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. त्यापैकी 140 कॅमेरे बसवले असून, पुणे स्टेशन येथे तब्बल 60 कॅमेरे बसविण्यात आल्याचेही शर्मा यांनी सांगितले.