नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीक केली. राहुल यांनी मोदी सरकारवर टीका करताना कुटुंब नियोजनासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या हम दो, हमारे दो या जुन्या घोषणेचा संदर्भ देत केवळ चार-पाच जण देशाचा कारभार करत असल्याचा टोला लगावला. मात्र आता राहुल यांच्या या वक्तव्यावरुन भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री असणाऱ्या गिरिराज सिंह यांनी राहुल यांचाच समाचार घेतला आहे. राहुल यांनी हम दो, हमारे दो मधून त्यांना गांधी कुटुंबाबद्दलच सांगायचे होते टोला गिरिराज सिंह यांनी लगावला आहे.
हम दो हमारे दो या जुन्या घोषणाचा संदर्भ त्यांनी स्वत:साठी दिला होता. ते स्वत:, त्यांची आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या बहीणीचा पती यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबद्दल साधा एक शब्दही उच्चारला नाही, असा टोला केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी लगावला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. गिरिराज सिंह यांनी या वक्तव्याचा संदर्भ काँग्रेस नेतृत्वावरुन सुरु असणाऱ्या वादाशी जोडला जात आहे. गांधी कुटुंबातील व्यक्तीलाच काँग्रेसचं नेतृत्व द्यावं की नाही यासंदर्भात पक्षामध्येच दुमत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गिरिराज यांनी हम दो हमारे दो तत्वावर पक्ष काम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
By 'hum do, hamare do', he (Congress MP Rahul Gandhi) was referring to himself, his mother, his sister, and his brother-in-law. He did not utter a single word on the Budget: Union Minister Giriraj Singh at Parliament https://t.co/BO13KoDtnm pic.twitter.com/fuudIiLLcU
— ANI (@ANI) February 11, 2021
दिल्लीच्या सीमेवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनला आपला पाठिंबा असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं. सुरु असणारं आंदोलन हे केवळ शेतकऱ्यांचेच आंदोलन नाही तर देशचळवळ आहे आणि सरकारला कायदे रद्द करावेच लागतील, असेही गांधी यांनी लोकसभेत म्हटले. आंदोलक शेतकऱ्यांपैकी २०० जणांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने श्रद्धांजली वाहिली नाही, त्यामुळे आपल्याला ते काम करावे लागत आहे, असे सांगत गांधी यांनी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली.
राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहण्याचं आवाहन केलं त्याला काँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने पाठिंबा दिला. नव्या कायद्यांमुळे भारताची अन्न सुरक्षा यंत्रणा धोक्यात येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हानी पोहोचेल तसेच रोजगार निर्मिती होणार नाही, असेही राहुल यांनी म्हटले.