नवी दिल्ली – राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींसाठी दोन विशेष विमाने खरेदी करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त स्वत:च्या इमेजची चिंता आहे. त्यांना सैनिकांची काळजी नाही. त्यांनी स्वत:च्या विमानासाठी 8400 कोटी रूपये खर्च केले.
इतक्या पैशात सियाचीन आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसाठी उबदार कपडे आणि अन्य महत्वाचे साहित्य खरेदी करता आले असते असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.
दरम्यान, त्यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीनेही उत्तर दिले आहे. ही विमाने केवळ पंतप्रधानांसाठी नाहीत तसेच या विमानांच्या आपूर्तीची प्रक्रियाही अगोदरच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच करण्यात आली होती, असा दावा भाजपने केला आहे.
सियाचिन आणि लडाख येथे तैनात सैनिकांसाठी उबदार कपडे आणि अन्य महत्वाचे साहित्य खरेदी करण्यास झालेल्या विलंबाबाबत एक वृत्त प्रसिध्द झाले आहे. राहुल यांनी त्याचा स्क्रीन शॉट शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. याच विषयावरून त्यांनी सरकारला मंगळवारीही लक्ष्य केले होते.
एकीकडे आपले जवान चीनपासून देशाचे रक्षण करण्यासाठी प्रचंड थंडीत सीमेवर तैनात आहेत. तर दुसरीकडे त्यांना उबदार कपडे देण्याऐवजी पंतप्रधान आठ हजार कोटीचे विमान घेत आहेत.