Bharat Jodo Yatra: देशातील सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भटकत फिरतोय; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

तिरुवनंतपुरम – महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. दरम्यान, त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शुक्रवारी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला की, भारत गेल्या 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारीच्या दराचा सामना करत असून तरुणांचे भविष्य मजबूत करणे आणि तरुणांच्या मनात सकारात्मकता आणणे हे काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे.
तरुणाईच्या ऊर्जेचा योग्य वापर करूया –
भारत जोडो यात्रेला आज नऊ दिवस पूर्ण झाले. ही यात्रा आज केरळमधील कोल्लममधून जात आहे. राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, आपला देश तरुणांचा देश आहे, तरुणाच्या रूपात आपल्याकडे खूप मोठी शक्ती आहे, जर आपण आपल्या तरुणांच्या ऊर्जेचा योग्य वापर केला, त्यांना योग्य दिशा दाखवली, तर आपला देश खूप वेगाने प्रगती करू शकतो. आज देशात गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी आहे, सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भटकत आहेत, निराशेच्या गर्तेत आहेत.
आपल्या तरुणांचा कणा मजबूत करणे हे आपले कर्तव्य देखील आहे आणि त्यांना सकारात्मकतेकडे नेणे ही काळाची गरज आहे. मी आमच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक तरुणांना भेटत आहे, त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना आमच्याकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे समजून घेत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमच्या भारत जोडो यात्रेचा उद्देश हाच आहे की आम्ही लहान मुले, वृद्ध, तरुण, महिला, मजूर, गरीब, शेतकरी आणि आदिवासी प्रत्येकाचे ऐकू शकू, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढू शकू. आम्हीही यशस्वीही होत आहोत. तरुण आमच्याशी मनमोकळेपणाने बोलत आहेत, एकत्र चालत आहेत. मला आशा आहे की आपण सर्वजण मिळून आपला भारत एक करू आणि त्याला पुढे नेऊ.





