नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते सरकार म्हणजे हम दो, हमारे दो अशी स्थिती आहे. सध्या देश फक्त चार लोक चालवतात, असे त्यांनी म्हटले.
पूर्वी कुटूंब नियोजनासाठी हम दो, हमारे दो अशी घोषणा दिली जायची. करोना विषाणू जसा नव्या रूपात आला; तशीच ती घोषणाही सरकारबाबत वेगळ्या रूपात आली. देश चालवणाऱ्या चार लोकांची नावे सगळ्यांनाच ठाऊक आहेत, असा तिरकस निशाणा राहुल यांनी साधला. त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच अंबानी-अदानी या उद्योगपतींकडे असल्याचे मानले जात आहे.
पुढे बोलताना राहुल यांनी वादग्रस्त कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावरून आक्रमक शब्दांत भूमिका मांडली. अन्नधान्यांची अमर्याद प्रमाणात खरेदी आणि साठेबाजी करण्याची परवानगी उद्योगपतींना देणे हा कृषी कायद्यांमागील उद्देश आहे. त्या कायद्यांमुळे देशाची अन्नसुरक्षा व्यवस्था उद्धवस्त होईल. तसेच, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला.
कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नाही. ते आंदोलन संपूर्ण देशाचे आहे. आंदोलन करणारे शेतकरी हटणार नाहीत. उलट, ते सरकारला हटवतील. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असेही राहुल म्हणाले.
दरम्यान, आंदोलनावेळी 200 शेतकऱ्यांनी प्राण गमावल्याचा दावा करत राहुल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळले. त्यांना कॉंग्रेसबरोबरच द्रमुक आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी उभे राहून साथ दिली. सरकारने श्रद्धांजली न वाहिल्याने तसे करत असल्याचे राहुल यांनी नमूद केले.