महाकुंभ चेंगराचेंगरी: ‘भाविकांपेक्षा व्हीआयपींवर अधिक लक्ष दिल्याने ही घटना घडली’, योगी सरकारवर भडकले राहुल गांधी

Rahul Gandhi on Mahakumbh Mela Stampede: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने त्वरित पाऊल उचलत उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.
मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमावर शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. वाढलेल्या गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यावर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी चुकीचे नियोजन आणि व्हीआयपी संस्कृती या घटनेला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. तसेच, या घटनेसाठी प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमी असलेले लोक लवकर बरे होतील, अशी आशा करतो.’
प्रयागराज महाकुंभ में भगदड़ के कारण कई लोगों के मौत और कईयों के घायल होने की ख़बर अत्यंत दुखद है।
शोकाकुल परिवारों के प्रति अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की आशा करता हूं।
इस दुखद घटना के लिए कुप्रबंधन, बदइंतजामी और आम श्रद्धालुओं की जगह VIP…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2025
दुःखद घटनेला चुकीचे नियोजन आणि सामान्य भाविकांपेक्षा व्हीआयपी हालचालींवर प्रशासनाचे विशेष लक्ष या गोष्टी जबाबदार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
महाकुंभ अजून बरेच दिवस आहे, अजून बरेच महास्नान होणार आहेत. आजच्यासारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये म्हणून सरकारने व्यवस्थेत सुधारणा करायला हवी. व्हीआयपी संस्कृतीला आळा घालायला हवा आणि सामान्य भाविकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने चांगली व्यवस्था करावी. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती करतो की त्यांनी पीडित कुटुंबांना मदत करावी, असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमावर शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. गर्दी एवढी प्रचंड वाढली की त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. मौनी अमावस्येसाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री अंघोळ सुरू झाल्यानंतर संगमावर गर्दी वाढली. रात्री 2 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सांगितले जाते.
या संदर्भात पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच, तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांना दिले.





