प्रभात वृत्तसेवा राहाता – माझ्या विधानाचा आणि कारखान्याचा काय संबंध? आमचा कारखाना सुरू होऊन ७५ वर्षे झाली. उध्दव ठाकरे यांनी एखादा तरी कारखाना सुरू केला किंवा चालवून दाखवला काॽ टीका करणे सोपे आहे. शेतकरी हिताचा एखादा उद्योग किंवा किमान बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन दाखवावा, असा टोला लगावून “उचलली जीभ लावली टाळ्याला” एवढेच त्यांचे काम असल्याची टीका जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी केली. अडीच वर्ष राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली पण एकही शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मराठवाड्यात जावून हेक्टरी ५०हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती, त्याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की ,ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे वक्तव्य होते.वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेऊन निवडणुका लढवल्या जातात. घेतलेल्या कर्जाची कोणतीही उत्पादकता होत नाही. यातून तेच पुन्हा कर्जबाजारी होतात. मात्र, वक्तव्याचा अर्धाच भाग दाखवून मला शेतकरी विरोधी ठरवल्याच्या मोठ्या वेदना झाल्या. माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनात कधीही शेतकऱ्यांच्या विरोधात माझी भूमिका किंवा वक्तव्य नाही. राज्यात कृषी मंत्री असताना सुरू केलेल्या अनेक योजनांची आठवण आणि लाभ आजही शेतकऱ्यांना मिळत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच जून २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याच्या आश्वासनाची पूर्तता निश्चित होईल, याची काळजी बाळासाहेब थोरातांनी करू नये, त्यांनाच कोणी वाली राहिला नसल्याची मिश्कील टिपणी त्यांनी सरकावर केलेल्या आरोपांवर केली. ठाकरे स्वत:भोवती घिरट्या घेत असावेत.. संघाच्या माध्यमातून शिवसेना संपविण्याच्या झालेल्या आरोपांवर बोलतांना मंत्री विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यांना भाजपाचे पाठबळ होते हे जगजाहीर आहे. आता किती दिवस तुम्ही शिळ्या कढीला उत आणणार आहात. तुमच्याकडे तुमचे सांगण्यासाठी काहीच राहील नाही. त्यांच्या घरावर कोण घिरट्या घालतय मला माहीत नाही, पण उद्धव ठाकरे स्वत:भोवती घिरट्या घेत असावेत, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.