पिंपरी – नदीपात्रात कोणी भराव टाकू नये म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने “रिव्हर मार्शल’ नियुक्त केले आहेत. तरीदेखील नदीपात्रात ठिकठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. चिखलीगाव येथील स्मशान भूमीच्या बाजूलाच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. या भरावाकडे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातही नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा पाटबंधारे विभागाकडून शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या नदी सुधार प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे शहरातील नदीच्या पात्रात आणि निळी पूर रेषेच्या आत मोठ्या प्रमाणात भर टाकून अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत.
नदीपात्रात राडारोडा टाकू नये आणि टाकल्यास तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी रिव्हर मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या रिव्हर मार्शललाही चकवा देत ठिकठिकाणी नदीपात्रात भराव टाकण्याचे काम सुरू आहे. नदीपात्रालगत ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. मात्र या कामाचे ठेकेदार ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदताना निघालेला राडारोडा नदीपात्रात टाकण्याचे काम करीत आहेत. याबाबत पर्यावरण विभागाला माहिती असूनही संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम ते करीत आहेत.
चिखली येथील स्मशान भूमीच्या बाजूलाही मोठा चर खोदण्यात आला आहे. हे खोदकाम करताना निघालेला राडारोडा दुसऱ्या बाजूला न टाकता थेट नदीपात्रातच टाकला आहे. मात्र याबाबत पर्यावरण विभागाला काडीचाही पत्ता नाही. त्यामुळे महापालिकेने नियुक्त केलेले रिव्हर मार्शल करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता ते बैठकीत असल्याचे
त्यांनी सांगितले.
महापालिकेचेच नदीपात्रात अतिक्रमण
चिंचवडगावात नदीपात्रात महापालिकेने अतिक्रमण केले असल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिले आहे. एवढेच नव्हे तर नदीपात्रात केलेले रस्त्याचे काम काढून घ्यावे, असेही सांगितले आहे. त्यामुळे महापालिकाच नदीपात्रात अतिक्रमण करीत असेल तर इतरांना बोलण्याचा महापालिकेला अधिकार आहे का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
चिंचवडमध्येही नदीकिनारी अनधिकृत बांधकामे
चिंचवडगावात नदीकिनारी विकास आराखड्यातील 18 मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील रहदारी वाढली आहे. ही संधी साधून अनेकांनी या भागात मोठ्या प्रमाणात पत्र्याची शेड उभारून ती भाड्याने दिली आहेत. या शेडमध्ये भाडेकरू असलेल्या गॅरेजवाल्यांनी त्यांच्याकडे आलेली भंगारातील वाहने येथील रस्त्यावर उभी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊनही महापालिकेने या बांधकामांना साधी नोटीसही दिलेली नाही.