पुणे -स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आली, तर भाजप त्यांचे आव्हान पेलणार का, हा प्रश्न कसबा पोटनिवडणुकीनंतर उपस्थित केला जात आहे. नागपूर, अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभव झाल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले. एवढेच नव्हे, तर ही निवडणूक प्रतिष्ठेचीही केली. परंतु ही निवडणूक महाविकास आघाडीच्या खिशात गेल्यानंतर मात्र आघाडीमध्ये बिघाडीऐवजी “पॉझिटिव्ह इफेक्ट’ दिसायला सुरुवात झाली आहे. आघाडीतील प्रत्येक नेत्याने आता “आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढलो तर यशस्वी होऊ शकतो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपला हे आव्हान पेलता येईल का, याची चर्चा आहे.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. या पराभवामुळे कॉंग्रेस पक्षाला शहरात आलेली मरगळ दूर होण्याची आणि अन्य पक्षांना आपण पेठेतही बाजी मारू शकतो याचा आत्मविश्वास आला आहे. पेठांमध्ये भाजपचे सुमारे 16 हून जास्त नगरसेवक आहेत. हे सगळे कसब्यात येतात. हे सर्व “भाजपेयी’ असूनही त्यांना कसबा राखता आला नाही, हा संदेश या पराभवातून गेला आहे. त्याचा फायदा विरोधीपक्ष घेणार आणि विजयाच्या बुस्टरवर कसब्याच्या “पीच’चा वापर करणार हे देखील या निमित्ताने पुढे आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत “स्वतंत्र लढणार’ अशा वल्गना आणि “आघाडीत बिघाडी’ असे शब्द ऐकू येणार नाहीत, असे समजायला हरकत नाही.