पुणे -महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्या सगळ्यांना फाटा देण्यासाठी “लव्ह जिहाद’ सारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातून धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. त्यात जनतेला गुंतवून ठेवले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त “अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे’तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी भुजबळ पुण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम लढाई सुरू झाली पाहिजे, जेणे करून त्यांना निवडणुकीला फायदा होईल, असे मत भुजबळ यांनी नाशिक येथील “लव्ह-जिहाद’ विषयावरील मोर्चाबद्दल व्यक्त केले.
‘अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमात घेण्याविषयी निर्णय घेण्यासाठी कोणतीही अभ्यास समिती अस्तित्त्वात नाही. सध्या जे कुलगुरू आहेत, ते प्रभारी आहेत त्यांना तो अधिकार नाहीत. कोणाची परवानगी नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार, असा मुद्दा उपस्थित करून आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे, असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. सगळ्या धर्मात अशा काहीतरी गोष्टी असतील त्याही अशाच शिकवाव्या लागतील. विज्ञान, इंजिनिअरिंग, फार्मसी आयटी वगैरे आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का? त्यासाठी प्राणायाम करा योगा करा, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
भिडे वाड्यासाठी आंदोलन
मंत्रालयात फुले दांपत्याच्या तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर भिडे वाड्याच्या प्रश्नाबाबतही लवकर बैठक घ्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यावर एक महिन्यात ते काय निर्णय घेतील ते पाहू, अन्यथा आंदोलन करणारच, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.