नगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी तसेच करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांसाठी शहर, गावांत क्वारंटाइन केंद्र उभारण्यात आली आहेत. तथापि, अनेक ठिकाणी सुविधांची वानवाच आहे. सरकारी सुविधेची केवळ कागदे रंगविण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणी प्रत्यक्ष सुविधा न देता निधी लाटण्याचे उद्योग सुरु आहेत.
त्यामुळे क्वारंटाइन केंद्र केवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ऍड. श्याम आसावा यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन केंद्रांना भेटी देऊन तेथील पाहणी करण्याची गरज आहे. बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी लोकवस्ती व बाजारपेठेपासुन दूर असलेली शाळा किंवा मंगल कार्यालयात क्वारंटाइन केंद्र उभारली आहेत. प्रत्येक क्वारंटाइनच्या केंद्राचे नियम व कार्यपद्धती वेगवेगळी असल्याचे आरोप होत आहेत.
वैद्यकीय तपासणी करुन रितसर प्रवासाची परवानगी घेतलेल्यांना क्वारंनटाइन करण्याची आवश्यकता नसल्याचे वैद्यकीय सूत्र सांगतात. अगदीच शंका किंवा गरज वाटत असेल, तर त्यांना स्वत:च्या घरात क्वारंनटाइन राहता येईल. तथापि, त्यांनाही अशा गावाबाहेरील क्वारंटाइन केंद्रात पाठविले जात आहे. त्यातही गाव पातळीवर हे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, क्वारंनटाइन सेंटरची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांनी तेथील संशयितांना किमान मुलभूत सुविधा द्याव्यात, ताकिद सरकार तसेच स्थानिक जिल्हाधिकारी देत आहेत. क्वारंटाइन झालेल्यांना दोन वेळचे जेवण, पिण्याचे पाणी, शौचालय, आंघोळीसाठी जागा व वापरण्याचे पाणी, हात धुण्यासाठीचे साबण, दातांची पेस्ट, सॅनिटायझर, झोपण्यासाठी सतरंजी व चादर, औषधे, वैद्यकीय पथकाची भेट आदी सुविधा द्याव्यात. तथापि, अनेक ठिकाणी अशा सुविधा असल्याचे केवळ भासविण्यात यंत्रणा पटाईन झाल्या आहेत. क्वारंनटाइन केंद्रात फिजिकल डिस्टंसिंग, सॅनिटायझेशन, स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
तथापि, बहुतांश ठिकाणी असे होताना दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात तक्रारदार आहेत. तथापि, त्यांची नावे उघड झाल्यास त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे खरच क्वारंनटाइन सेंटरमध्ये हे सगळे पाळले जात आहे का? लोकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात? याची माहिती जिल्हा प्रशासाने अचानक भेटी देऊन घ्यायला हवी, अशी मागणी ऍड. आसावा यांनी केली आहे.
भलत्याच आजारांचा करावा लागेल सामना!
अनेक ठिकाणी क्वारंटाइन केंद्रांतील सुलभ शौचालयांत दुर्गंधी आहे. वापरण्याचे पाणी स्वच्छ नाही. डासांचा त्रास आहे. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. या दुरावस्थेने विलगीकरणातील लोक पळून जात आहेत किंवा तेथे राहण्यास तयार नाहीत, असा दावाही ऍड. आसावा यांनी केला आहे. अशा परिस्थितीतील क्वारंटाइन केंद्रात करोनाऐवजी भलत्याच आजारांनी ग्रासले जाण्याची शक्यताच अधिक असल्याचे ते म्हणाले.