मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य केले होते. राज ठाकरे म्हणाले होते, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरेंनी भोंग्यासंबंधी अल्टिमेटम दिला असून बुधवारी संपूर्ण राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंवर ठाकरे सरकारकडून टीका केली जात आहे. याचवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
याच मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण झालेल्या कार्यक्रमात पत्रकरांनी प्रश्न विचारला असतांना भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले भोंगा लगाओ या न लगाओ, आपका मामला है वो, उसमें मैं क्या बोलू? असा उलट प्रश्न विचारत त्यांनी पत्रकरांना उत्तर देणे टाळले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा लावण्यावरून राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेसोबत भाजापा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे.